Saturday, 25 February 2012

प्राण

दुरस्थ कंदिलप्रकाशात
चालतोय आपण.
अंधार काजळीचं विश्वरुप
विद्ध करणारया,
प्रकाशकिरणाचं बोट पकडून.

दुतर्फा उभ्या पसरलेल्या,
आरशांच्या भिंतींतुन,
थरारताहेत आपल्या
भयाण, निश्चल
सावल्यांची प्रतिबिंबं.

त्या मानवीय नाहीत.
त्यांना पाय नाहीत.
त्या नीरव शोकावर्तात
कालबद्ध आहेत.

त्यांची काजळी
लावून घेऊ
आपल्या व्रणांना.
त्याने आपण एक होऊ?
निदान आपली प्रारब्धं?

आपण एकमेकांचे कोण?
ते माहित नाही.
तरी इथे नजरेत दिसतोय
तुझ्या अभावांना माझा चेहरा
नी माझ्या अभावांना तुझा.
तुच आहेस माझी पायवाट
म्हणून सांगतो,
या कंदिलापलिकडे आपण
अनादि नसु.
पण कंदिलच आहे आपल्या
ब्रम्हाची सीमा.
मर्यादेच्या काठावरुन
कलंडणारी अमर्यादा!

तसं आपणा दोघांनाही आहे,
त्या पुरातन शापाचं वरदान.
नी आपण समिधा आहोत.
आपण आर्त आहोत.
आणि आपण चालतोय.

Thursday, 23 February 2012

मुक्तीद्वार

भगव्या देहाचे मुक्तीद्वार
पाठीवर घेऊन
तो चढत जातो
पहाडी वाट
जाणिव नेणिवेच्या
अनुभुतीची बीजं
विखरुन देत वाटेवर
जात पंथ
धर्म वर्ण
रंग लिंगांतुन
मुक्त होण्यासाठी
स्वताला निर्विकाराने
भारण्यासाठी

पहाडाच्या टोकावर
तो वाट पहातो
मुक्तीद्वार उघडण्याची
बघ मी समाजमितीच्या
सगळ्या संकल्पना
सोडुन आलोय
आदिम होऊन आलोय

तरी ते उघडत नाही
मग देतो ढकलुन
निमिषार्धात
पहाडाच्या टोकावरुन
गडगडत
धडधडत
ते पायथ्याशी येतं

तितक्यात कुठुनसं
भयशुन्य फुलपाखराचं
अस्तित्व लहरत येतं
आणि त्यामागे
कुतुहलाचे पाय घेऊन
एक लुतभरलं कुत्रं
स्वताचं आत्मभान
द्विधा करणारी
खाज विसरुन
वेड्यासारखं झेप घेतं

तडजोडीचं नेमकेपण
नाकारणारी
अंतप्रेरणेची मुळं
आवेगानं दार उघडतात
नी दोघांना सामावून
घेतात
आणि तिथल्या तिथे
ध्यानस्थ ऋषीच्या
डोळ्यांसारखं
दार शांतपणे मिटतं

तो पाहतो उंचावरनं
स्वानुभुतीच्या
व्युहरचनेतनं
स्वयंभु अभावांची
तिरीप येते
आत्मा शरीर मन
चाचपून घेते

तो खाली उतरतो
शांतपणे
मंदपणे
हसत हसत
श्राप भोगत
सिसिफसत

माणसाळलेला माणूस

माणसाळलेला माणूस
नाक्यावरती उभा असतो.
समाज न्याहाळत,
भूक चघळत
थंडपणे श्वास घेतो.

हातात हात घालुन,
फुलं माळलेली
कपल्स येतात.
एकमेकांना किस करत,
धुंद होत निघुन जातात.
तो कोल्डपणे म्हणतो
"सो कूल"
आणि पडलेलं फूल
खिशात ठेवतो.

तसं सहसा चिंतनमुक्त
जगत नसतं कुणीच
त्यात कधीकधी
संपृक्त शरीरावर
अतृप्त विचारांची
बांडगुळं चढतात,
तेव्हा तो स्वताशीच
खदाखदा हसतो.
'ऐला भारीच' म्हणत
विचारांची पिंक टाकतो
की पिंक त्याला टाकते?
सगळा हिशेब एकच!

मिरवणुकीमागे चालत जातो.
अर्धातास भाषणं ऐकतो.
नंतर स्वत:शीच वैतागून म्हणतो,
'आदिवास्यालाही
आध्यात्मिक फिल करुन देईल,
तोच खरा धर्म!'
मग मनातल्या मनात
थुंकून तो चालु लागतो.
समाजाकडुन समाजाकडे....

तशात संध्याकाळ होते.
ढगाळून येतं.
भुकेल्या पोटाला
शहाणं मन काहिसं
गोंजारुन घेतं.
तो निर्विकारपणे
त्यांच्यात मिसळतो.
सगळी गर्दी अंगावर घेतो.

भयभीत झुलत्या पुलावरुन,
शुन्य ओढत गर्दी जाते.
जगण्या मरण्याच्या
तथाकथित संदर्भाँकडे.
कुणीच काही बोलत नाही.
तरी काहीच टळत नाही.
शांतपणे जळत रहातात,
रस्त्यावरचे दिवे....

Monday, 6 February 2012

अशांत वारा

'तुमचं जगणं नामंजुर केलंय!'
अशा आशयाचे खलिते येतात.
त्यातली उद्विग्न शाई,
धुमसताना दिसते.
ती तो पिळुन घेतो.
जखमांवरचे मलम म्हणुन.

वेदनेचे काय?
आजची जगुन झाली
तरी उद्याची जगायची असतेच.
त्यामुळे त्याला किंचितही
भिती वाटत नाही दुःस्वप्नांची

पायाखाली माझी माती आहे.
अन छातीमध्ये सुर्य आहे.
मग चिरंतन वाटेवरचे अनेक हात,
सोबतीला येतील प्रकाशाकडे.

चालता चालता रात्र होते
हाडांना आरपार चिरणारी
कडाक्याची थंडी...
तो झोपतो.
फुटपाथवर
गटाराच्या कडेला
स्ट्रीटलाईटखाली.

तेव्हा ते माग काढत येतात.
संगिनीच्या टोकावर डकवलेलं,
उदारमतवादी घोंगडं
त्याच्याकडे सरकवतात.
त्याच्या हजारो छिद्रातुन,
अंधुकसा प्रकाश गळत असतो.
'हा भुमिगताला पुरणार नाही!'
तो शांतपणे उद्गारतो.

मग पुन्हा खलिते येतात.
नामंजुरीचेच.
त्यावर कुणाचं तरी रक्त असतं.
बेड्या, वधस्तंभ असतात.
पाहुन, लहान मुलासारखं
तो कोवळं हसतो.
आणि उत्तर लिहायला बसतो.
'प्रस्थापितांनो,
ह्र्दयात जोवर निखारे आहेत
आणि आहेत अशांत वारे
तेथपर्यंत खोल रुतत-रुजत राह्तील,
क्रुसावरचे खिळे.
भेटुच आपण पुन्हा.
वस्त्यांत
पोलिसचौक्यांत
आणि रस्त्यांवर....
ता.क.: मी तुम्हालाच नामंजुर करतोय.

Friday, 3 February 2012

तुटलेल्या मैत्रीणीस :२

 तुटलेल्या मैत्रीणीस,

आपण एकमेकांवर प्रेम करता करता,
एकेक दरवाजे बंद करत गेलो.
नवे न उघडता.
अंर्तभागात जसे हलतात सूर,
तशाच विस्कळीत होत चालल्यात
आपल्या वेदना.

त्यालाही आता पर्याय नाहीये.
आपल्यात लपलेला एक खाटिक होता.
तुकड्या तुकड्यात जगणारा.
स्पर्शाचं शिवार मावळे पर्यंत,
त्वचा सोलुन ,
आपली शरिरं आंधळी केली त्यानं.

नंतर आपण एकमेकांच्या
प्रेतयात्रेतही सामील झालो.
झिंगलो,
रडलो,
नाचलो....सर्व काही

पण आता तुझा कंटाळा येतोय.
ओलाव्याची माती गळुन पडतेय,
फुलांसकट
चिरंतन तेवणारया डोळ्यांना,
सारखं वाटतंय की काहीतरी
भयंकर चाल करुन येणार आहे.
पण जिव्हारी लागलेला काळोख
मला हलवुन हलवुन जागं करतो
आणि माझेच शब्द माझ्याकडे पाहुन
खदाखदा हसत सुटतात.
दबक्या आवाजात बजावत रहातात
'तु माणुस म्हणुन जगतोयस
आणि माणुस म्हणुनच उरणार आहेस.'

म्हणुन आता उचल त्या ओळी,
आणि भिरकावुन दे माझी कविता.
त्याबदल्यात,
मी तुला तुझं जगणं परत करतो.
तुझ्या काजळभरल्या डोळ्यांसकट.
मग आपण एकमेकांकडे पाठ करु
आणि खोल अंधारात निघुन जाऊ.
आधीच आपण भिन्न होतो.
आता आपण शुन्य होऊ.

मग अशाच कुठल्यातरी,
एखाद्या रानाच्या अंर्तभागात
भयाण दुःखासारखं ,
निपचित पहुडलेलं तळं असेल
त्यात थेंब थेंब शुन्यपणे,
गळत असेल काळसर निळाई,
नक्षत्रफुलांच्या सावलीवर.
निमुट एकटी होडी असेल,
डुचमळत हेलकावे खात
चंद्राच्या निर्विकार देहासह,
तरंग उठतील,
नक्षत्र थरारेल,
आणि हलकेच त्या निळाईत
विरुन जातील, मंदपणे.
शेवटच्या श्वासाची
माझी वैराण स्पंदने......
                       - हरवलेल्या जहाजाचा कप्तान

Sunday, 29 January 2012

काळ, मन आणि वेग


भुतकाळाचा मागोवा घेत
इतिहास खोदत बसणारे
बनुन जातात अश्वत्थामा
नवनिर्मीतीचा आत्मा त्यागुन गेलेलं
जखमी कलेवर......
त्यांचा श्वास अनुबद्ध असतो
आपल्या मारेकरयाशी,
जखम देणारयाशी.

जगता जगता,
अनेकदा आभास होतो.
आणि दिसतात,
भविष्याकडे जाणारया
आपल्याच पावलांच्या
रक्ताळलेल्या पाऊलखुणा
वाटते, सारे काही इथेच संपावे
असेच वर्तमानात.
निसटुन जावे सगळे स्वतःचे..
वाहुन जावे सारे जमवलेले..
स्वतःसकट नी स्वतःशिवाय!

भीतीची अनोळखी स्पंदनं
शांत पावलांनी येतात
जीवनाच्या, भावनांच्या
पुंजांमध्ये शोधत रहातात,
निषिद्ध अंधार.....

मात्र आम्ही वर्तमानात
जगतो?!
नव्हे केवळ  असतो.
वर्तमानात असते ती
केवळ भूक!
शाश्वत आणि चिरंतन! 
                            (yet to complete this poem.)

Tuesday, 24 January 2012

दोन प्रयास

शरीराची वावटळ काही मिन्टांची
मनाची वादळं काही अंशाची !
उत्तर चुकेल,
तिढा हुकेल,
प्रकाशाचा पदर ढळेल!

दुःखाची फुले वेचुन घेऊ
नी सुखाचं निर्माल्य होऊ
ये, पुर्णांशाने नग्न होऊ
नी पहाडावरुन जीव देऊ

Sunday, 15 January 2012

ते सर्व

बांधावरती उभे रहातात  एकमेकांना खेटुन
ते सर्व!
त्यांचं त्यांनाच कळत नाही
हळुहळु ते स्वतःच होऊन जातात बांध.
मनातला किंवा  मनाबाहेरचा अंधार
थोपवत रहातात, उद्याच्या आशेने
पण एकमेकांना खेटुन,डोळे गच्च मिटुन
आणि लाटेकडे पाठ फिरवुन
प्रश्न सुटत नसतात.
मग अंधारपोकळीचं अवकाश होतं.
शरिरं भरडतात,
मनं उध्वस्त होतात.
रक्त, हिंसा आणि आरोळ्यानी
सारं काही भरलेलं असताना,
अन्यायी राजा नी शुर प्रजा
गोष्टीमधुन फक्त हसतात.

दंगलीत मेलेल्या कुणाचं तरी शव
असंच पडुन रहातं मार्गात.
कोल्हेकुत्रांच्या भयासकट
नगर ध्वस्त होत रहातात.
त्या सर्वांसकट नी जिवंत प्रेतांशिवाय!
मग ते सारे जमतात सुद्न्यपणे
काही झालंच नाही अशा मनाने.
वाळवी उखडुन टाकली जाते,
अंधार लिहीला जातो,
मिटवला जातो
प्रश्नांसकट
व्रणांसकट
पण नुसतं लिहुन अंधार संपतच नाही
अंधार संपण्यासाठी नसतोच मुळी
बांध मात्र तुटण्यासाठी बनवले जातायत
शतकानुशतकें.....




नियती

गर्दीत लहान मुलासारखं
शरिर हरवुन बसतं कधीतरी
सैरभैर, प्रश्नांकित
आणि मनाला आपण हरवु देतो
कधीकधी वेगळं जगता यावं
म्हणुनसुद्धा....

पण नियती कधीच
हरवुन बसत नाही स्वतःला
आंधळ्या डोळ्यांनी
नी बांधलेल्या हाताने
धापा टाकत मूकपणे
चालत रहाते.

तिच्यात सापळ्याआड धडधडणारं
असं काहीच नसतं
कुण्याच्याही स्पर्शाने
उभे रहाणारे किंवा सुटणारे
प्रश्न नसतात

भंगणारी आकांक्षा,
फाटलेलं ह्र्दय
शोकाचे सुर
पश्चातापाचे निश्वास
जखमा आणि सारं काही
शवपेटीत बंद.

चालताना सोबत असते फक्त
एक न संपणारी शवयात्रा

Wednesday, 28 December 2011

विक्रीदर- २

कविता लिहिली
मुल्यं वाटली
क्रांती विकली
रॉयल्टी मिळतेय.


सामान्य माणूस
ट्रेनमध्ये
वाचतोय
ग्रुपमध्ये
बोलतोय

स्वप्नं पहातोय नेमाने.
आशा करतोय अजुन,

देव आहे कुठेतरी
रॉयल्टी घेतोय मोजुन.